मुंबईत तब्बल २५० ताडीच्या दुकानांमधून क्लोरल हायड्रेट हे अंमली रसायन टाकून ताडी विक्री होत असल्याचे प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांनी दिलेल्या माहितीवरुन मुंबई पोलिसांनी शनिवारी, ११ मे रोजी छापा टाकून नाशिकमधील अंमली रसायन निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. याच कारखान्यातून मुंबईतील ताडी दुकानांना रसायनाचा पुरवठा होत होता. यानिमित्ताने मुंबईतील अंमली पदार्थ विक्रीचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत येऊन पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील युनिट १ आणि ३१ मधील खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ताडीच्या २५० दुकानांना क्लोरल हायड्रेट या अंमली पदार्थाचा (केमिकल) पुरवठा करणार्या व्यंकटा करबुय्याला (४६) याला त्याच्या दोन दिवसांपूर्वी अन्य दोन साथीदारांसह अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी ४५ लाख ३४ हजार ३०० रुपयांचे केमिकलही जप्त केले होते. या संशयितांनी दिलेल्या माहितीवरुन अंमली पदार्थाचे धागेदोरे थेट नाशिकमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार आरे पोलिसांसह हे पथक नाशिकला दाखल झाले. याबाबत स्थानिक पोलिसांना जराही कुणकुण लागणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरात हा कारखाना असल्याचे समजल्यानंतर पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी कारखान्यातून लाखो रुपये किंमतीचे अमली पदार्थाचे रसायन जप्त केले.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली. ओझऱ येथील कत्तलखाना उद्ध्वस्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.