रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात पक्ष संघटनेची बांधणी करता यावी, यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. काल (ता. 13 जुलै) चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे हे दापोलीमध्ये आहेत. कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलण्याआधी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी दापोलीच्या मध्यवर्ती कार्यालयातून संवाद साधला. सध्या राजकारणात जे काही सुरू आहे. त्यामुळे कुणाबरोबर मी जाईल हे मला वाटत नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. (Raj Thackeray’s scathing criticism of the government)
हेही वाचा – महानगर विशेष : नोकर भरतीसाठी लाखोंचा बाजार; तब्बल २० ते २५ लाखांचा रेट ?
दापोलीत प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुणाच्या हातात काय राहिले? मला कळतच नाही. हम करे सो कायदा सुरू आहे. अजूनही निवडणुका होत नाहीत. दोन दोन-तीन तीन वर्ष निवडणुका प्रलंबित आहेत. हे गंभीर आहे. त्यावर कोणी बोलत नाही. चालढकल सुरू आहे, असे म्हणत त्यांनी सतत लांबणीवर पडणाऱ्या निवडणुकांबाबत संताप व्यक्त केला. तसेच जर का मी कोणासोबत गेलो तर जनतेची प्रतारणा असेल. जी मी करणार नाही, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, मोबाईल नावाचे माध्यम आले आहे. पूर्वी लोक राग व्यक्त करायचे आणि रस्त्यावर उतरायचे. आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करत आहेत. त्या मोबाईलवरील प्रतिक्रिया राजकारणी पाहत नाहीत. ते फक्त शांत जनता पाहतात. कारण जनता मोबाईलवर राग व्यक्त करून मोकळी झालेली असते. जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत हे लोक वठणीवर येणार नाहीत, असे अप्रत्यक्ष आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
पत्रकारांनी सुद्धा राजकारण्यांना प्रश्न विचारताना कडक भूमिका घेतली पाहिजे. कारण ज्यावेळी पत्रकार लोक प्रतिनिधींसमोर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा ते प्रश्न पोटतिडकीने उपस्थित केले पाहिजेत. राजकारण्यांनी दिलेल्या उत्तरावर पत्रकार हसतात, त्यामुळे आपण बरोबर बोलत आहोत, असे त्यांना वाटते. जे झाले नाही पाहिजे, असे मत देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कोकणाक दर महिन्याला कार्यशाळा होणार आहेत. यामध्ये पक्षाकडून देण्यात आलेले कार्यक्रम कसे राबवले जातात? कोणता पदाधिकारी किती काम करतो, हे पाहून त्यांना त्या पदावर ठेवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.