आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. ‘आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेने आमच्या सोबत रहावं ही आमची इच्छा आहे’, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दुष्काळाला प्राधान्य न देता राममंदिर प्रश्नावर भर देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेचा भाजपला तोटा होणार नसल्याचंही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं. लातूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विनायक पाटील, खा. सुनील गायकवाड हे देखील यावेळी उपस्थित होते. दानवे म्हणाले की, लातूरला आम्ही आढावा बैठकीसाठी आलो असून, राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघात बूथनिहाय निवडणुकीची तयारी सुरु आहे. डिसेंबरमध्ये तालुकानिहाय बूथ कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जातील. आगामी निवडणूक समविचारी पक्षासोबत लढवण्याची आमची इच्छा आहे. शिवसेनेने सध्या राममंदिराचा मुद्दा प्राधान्यक्रमाने उचलला असून, भाजपची त्याला हरकत नसल्याचे दानवे यावेळी म्हणाले.
वाचा: हीन दर्जाचे राजकारण करू नये– रावसाहेब दानवे
पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र आले तरी भाजपला निवडणुकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यात आणि केंद्रामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीकाही केली. विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडून येणार या भीतीने विरोधकांच्या पोटात गोळा आला असणार आणि त्यामुळेच ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.