गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, पुणे, कोकण, नाशिक या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अजूनही पुराचं थैमान सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूरमधले अनेक भाग अक्षरश: पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. एनडीआरएफचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, पुराचं स्वरूपच इतकं भयंकर आणि व्यापक आहे की त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक देखील बचावकार्यामध्ये सहभागी होत एनडीआरएफला मदत करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देखमुख यांचा मात्र कुठेच पत्ता नव्हता! राज्यातली जनता एकीकडे प्रत्यक्ष मृत्यूशीच झुंज देत असताना सुभाष देशमुख मात्र सांगलीत पाहाणी करताना दिसत नव्हते. खुद्द मुख्यमंत्री देखील कोल्हापुरात जाऊन आले. मात्र, आपण पालकमंत्री असलेल्या सांगली जिल्ह्याला काही सुभाष देशमुखांनी भेट दिली नव्हती. मात्र, अखेर त्यांना भेट देण्यासाठी वेळ मिळाला असल्याचं समजतंय.
सुभाष देशमुखांची ‘ट्वीटर’वरून पाहाणी!
सुभाष देशमुख राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असूनही आधी नाशिक, नंतर पुणे, नंतर कोल्हापूर, नंतर कोकण आणि आता सांगली अशा ५ राज्यांमध्ये पावसानं जनसामान्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. मात्र, तरीदेखील सुभाष देशमुख मात्र कुठेही पाहाणी करताना दिसले नाहीत. अखेर, शुक्रवारी त्यांना वेळ मिळाला असून ते दुपारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुभाष देशमुख एकामागोमाग पूरग्रस्त भागावर लक्ष ठेऊन असल्याचे फोटो ट्वीट करत होते. मात्र, प्रत्यक्ष त्या घटनास्थळावर ते दिसले नाहीत.
आपत्ती व्यवस्थापन मंञालय, मुंबई. .
सर्व ठिकाणच्या पूरपरिस्थितीवर २४ तास देखरेख व मदतकार्य पोहचवण्यात यश. pic.twitter.com/VUREJZoSGW— Subhash Deshmukh (@DeshmukSubhash) August 8, 2019
आपत्ती व्यवस्थापन मंञालय, मुंबई येथुन
आज पहाटे ६ वाजल्यापासून राज्यात अतिवृष्टीमूळे झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. pic.twitter.com/Vh89MPGumF— Subhash Deshmukh (@DeshmukSubhash) August 8, 2019
पूरपरिस्थिती व मदतकार्य आढावा बैठक पुण्यात विभागीय आयुक्तांसोबत घेतली. सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत भरून घ्या,पूरपरिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे.सध्या उजनीतून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, काही तालुक्यांवर आपत्तीजनक परिस्थिती ओढावल्यास प्रसाशन सज्ज आहे. pic.twitter.com/9KSf3NgoEK
— Subhash Deshmukh (@DeshmukSubhash) August 7, 2019
Kolhapur,Sangli,Pune,Satara, Palghar,Raigad, Ratnagiri Collectors joined this meeting via video conferencing and briefed CM on various relief measures.
11,432 people are evacuated so far from Kolhapur & 3000 from Raigad.
53000 people from Sangli district shifted to safer places. pic.twitter.com/oMZqTwAtKA— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 7, 2019
हेही वाचा – प्रशासनाच्या गंटागळ्या, पाच जिल्ह्यांमध्ये ३४ मृत्यूमुखी
अलमट्टीचा दिलासा!
एकीकडे राजकीय अनास्थेची टीका होत असताना दुसरीकडे सांगलीकरांचा आणि कोल्हापूरकरांचा संघर्ष मात्र अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी देखील या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचा जीव टांगणीला लागला आहे. अलमट्टी धरणातून जादा विसर्ग करण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मान्यता दिल्यामुळे थोडासा का होईना दिलासा पूरग्रस्तांना मिळाला असला, तरीदेखील अजूनही शेकडो संसार पाण्याखालीच असल्याचं चित्र कोल्हापूर-सांगलीमध्ये दिसत आहे.