भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी आहेत, अशी टीका केली होती. आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलं आहे. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य वास्तववादी आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत हे राज्याच्या पंचायतराज समिती दौऱ्यावर आहेत.
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहलंय की शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची जी कुटनीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. यामुळे देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिलं जात नाही, असं खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत यांनी पुढे बोलताना शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहित झालं आहे, असं म्हटलं. तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.