राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केलेलं भाष्य हे केवळ शिवसेनेचं मत नसून संपूर्ण भारताचं मत आहे. या देशात ईडी ठरवते की कोण कोणत्या पक्षात जाणार, हे योग्य नाही. निवडणूक आयोगसारख्या यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरू आहे. तसंच, शरद पवार हे हयात असताना, त्यांचा पक्ष हा अजित पवारांना दिला जाईल. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल, असं म्हणत संजय राऊतांनी भीती व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ( Sanjay Raut Criticized and blamed Modi Government and Election Commission over split in Sharad Pawar NCP )
राऊत म्हणाले की, बाळासाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे असताना तुम्ही शिंदेंसारख्या ऐरागैऱ्यांना देता. हा कोणता कायदा आहे? शरद पवार आहेत. त्यांचा पक्ष आहे. ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही त्यांचा पक्ष इतरांना देत आहात. हे या देशात होत आहे. निवडणूक आयोगाचा गैरवापर होत आहे. सर्व यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असा आरोप राऊतांनी केला.
शरद पवार यांनी जे परखडपणे भाष्य केलं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. शरद पवार म्हणाले की कोण कोणत्या पक्षात जाणार हे आता ईडी ठरवत आहे. कोण मंत्री बनावं आणि कोणी काय बनावं हे ईडी ठरवत आहे. त्यामुळे देश चिंतेत आहे. काल, शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भावना या शिवसेनेच्याच नाही तर देशवासियांच्या भावना आहेत. जे शिवसेनेच्या बाबतीत फुटीनंतर घडलं ते राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाव न घेता राज ठाकरेंवर साधला निशाणा
तसंच, राऊतांनी शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यात चाललेल्या फोटो लावण्याच्या लढाईत उडी घेतली आहे. राऊत म्हणाले की, शरद पवारांना दैवत म्हणता आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसता, हे ढोंग आहे. पुढे राऊत शिवसेनेचा दाखल देत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी शिवसेना फोडली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना फोटो न लावण्यास सांगितलं होतं. परंतु राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते की, माझा फोटो वापरू नका. तुम्ही माझ्यापासून दूर गेला. माझा विचार तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही दूर गेला ना, मग माझा फोटो वापरू नका, असं बाळासाहेब म्हणाले होते, असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.