मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार काल गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) भेटले. त्यांनी आपली भूमिका मांडली. या तिन्ही पक्षातील खासदारांनी लोकसभेत आवाज उठवला. पण पळपुटे खासदार गप्प बसले. त्यांनी सीमाप्रश्नांवर तोंड उघडले नाही. भूमिका घेतली नाही. याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नी वाद वाढलेला असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली नसल्यानेही राऊतांनी (Sanjay Raut) संताप व्यक्त केला. (Sanjay Raut on Maharashtra Karnatak Border conflict)
आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमच्या बापाचं, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं आहे. पण आमचे मुख्यमंत्री काय करत आहेत? हा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईंना कशाप्रकारे उत्तर देत आहेत? ते लढाईला उतरले आहेत का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. तसंच, गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंड उघडलं नाही, असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा – गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, बोम्मईंचा पुन्हा महाराष्ट्राला इशारा
बोम्मई म्हणतात अमित शाहांचं ऐकणार नाही. मग अमित शाहा कसली मध्यस्ती करणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राची अवहेलना आणि अपमान करण्याचं षडयंत्र रचलं जातंय. ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांचा अपमान करतात. ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत नाहीत. ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात. ज्या पक्षाचा प्रवक्ता औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षाचा हा वंश आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
चंद्रकांत पाटील यांनी काल ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शिक्षणसंस्था सुरू केल्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठलराम शिंदे यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. ज्योतिबा फुले यांचं टाटापेक्षा जास्त उत्पन्न होतं. त्यांनी आपली संपत्ती दानधर्मात दिली. टाटांचं उत्पन्न २० हजार होतं तेव्हा ज्योतिबांचं उत्पन्न २१ हजार होतं, अशी नोंद आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – वाद विकोपाला! शिवरायांनंतर आता फुले, आंबेडकर, कर्मवीरांवर टीका; आव्हाडांचा भाजपावर संताप