राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सहकारी बँका वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली असून सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे पत्रात म्हटले आहे. माझ्या या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहमत असतील, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
सहकारी बँकांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. याबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. “सहकारी बँकांचे सहकारपण कायम ठेवले पाहिजे. असे झाले तरच या बँका आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलणे हे समस्येचे निराकरण नाही. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असे म्हणणे चुकीचे ठरेल,” असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
I have written a letter to Hon. @PMOIndia Shri @narendramodi to express my deep concern about the preservation of the ‘Co-operative’ character of Co-operative banks having legacy of more than 100 years. pic.twitter.com/CZ6IBu4kZ1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2020
सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी आम्ही सहमत आहोत. २०१९-२० या आर्थिक वर्षात सहकारी बँकांमध्ये गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारीचा हवाला दिला आहे. १०० वर्षे जुन्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या सहकारी बँकांवर विनाकारण निर्बंध न घालण्याचे आवाहनही शरद पवारांनी केले आहे.
सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना लाल किल्ल्यावरुन संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांच्या हितांच्या संरक्षणासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणल्याची माहिती दिली होती. शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केले होते. मात्र, सहकारी बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेचा प्रभाव वाढत असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रासह या बँकांचं होणार खासगीकरण