मराठा आरक्षणाला खुद्द शिवसेनेचाच विरोध असल्याने सर्वपक्षीय बैठक होऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का, असा सवाल करत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकवचनी होते. मात्र, त्यांचे वारसदार शब्द न पाळणारे मुख्यमंत्री असल्याचे टिकास्त्रही मेटेंनी सोडले.
नाशिकमधील शासकीय विश्रामगृहावर सोमवारी (दि.२१) मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थिगिती दिल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. या बैठकीतून मार्ग काढू असे, आश्वासन दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे हे वचन पाळणारे नाहीत. बाळासाहेब ठाकरे एकवचनी होते; मात्र, त्यांचे वारसदार शब्द पाळत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांवर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, सरकार शब्द देऊनही पाळणार नसेल तर, आंदोलनाची धार तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रवादी-शिवसेना आरक्षणाविरोधात
मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चांना शिवसेनेने कधीही पाठींबा दिला नाही. त्यामुळे शिवसेना पहिल्यापासून आरक्षण विरोधात आहे. अद्यापही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आरक्षणावर ठाम भूमिका घेत नसल्याने हे दोन्ही पक्ष आरक्षणाविरोधात असल्याचा आरोपही मेटे यांनी केला.
राज-उद्धव यांत ‘हा’ फरक
मराठा आरक्षणासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे मेटे यांनी या स्वागत करताना मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला. एक ठाकरे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतात तर दुसरे आरक्षणाबाबत शब्द देऊनही पाळत नाहीत. बाळासाहेबांच्या वारसदारांमध्ये हाच फरक असल्याचेही त्यांनी सांगितले.