घरमहाराष्ट्रगुजरात जिंकणारच होते, पण हिमाचल, दिल्लीने का नाकारले? संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल

गुजरात जिंकणारच होते, पण हिमाचल, दिल्लीने का नाकारले? संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

Subscribe

दिल्ली महापालिका निवडणुकीसह, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांचा निवडणुकीचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यातील दिल्ली महापालिकेतील 15 वर्षांपासूनची भाजपची सत्ता उलथवत आपने सत्ता काबीज केली, तर हिमाचल विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला, मात्र गुजरातमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले. पण गुजरात पंतप्रधान मोदींचा होमग्राऊंड असल्याने तिथे भाजपची सत्ता आल्याने अनेकांना त्यात काही नवलं वाटलं नाही. याच एकूण मुद्द्यावर आज सामनच्या रोखठोकमधून भाष्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांतही विरोधकांना चांगले यश मिळाले. पण तरीही चर्चा फक्त गुजरातचीच. गुजरात जिंकणारच होते. हिमाचल, दिल्लीत लोकांनी का नाकारले? असा ‘रोखठोक’ सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून उपस्थित करत यावरही चर्चा होऊ द्या! असं म्हटलं आहे.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ते शक्य झाले. गुजरात जिंकले. ते जिंकणारच होते. पण भाजपाने हिमाचल प्रदेश गमावले व दिल्लीची महानगरपालिकादेखील गमावली. हिमाचलमध्ये कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. या दोन राज्यांत मोदी मंत्र का चालला नाही? गुजरात विजयाचा उत्सव करणाऱ्यांना हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

- Advertisement -

राजकारण एक खेळ आहे. चलाख लोक हा खेळ खेळतात. मूर्ख लोक त्यावर दिवसभर चर्चा करतात. सध्या आपल्या देशात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे. भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. गुजरात सोडले तर दोन ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपने गुजरात जिंकले त्यात नवल ते काय? असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

मोदींचे गुजरात दुसरे कोण जिंकणार? गुजरातमधील प्रत्येक प्रचारसभेत नरेंद्र मोदी सांगत होते, ”हे गुजरात माझे आहे. हे गुजरात मी बनवले आहे,” अशी भावनिक साद व काँग्रेसचे संघटनात्मक फोलपण यामुळे गुजरातवर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने जे गमावले त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. भाजपने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजप पराभूत झाली. देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपची सत्ता खेचून घेतली. म्हणजे तीन सामन्यांत भाजप फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही. याआधी ती पंजाबमध्येही अजिबात चालली नाही, पण भाजप फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्सवात पराभवाची चर्चा करणे लोक विसरतात. हा मूर्खपणाच आहे, असंही सामनात म्हटलं आहे.

- Advertisement -

उद्याचे चित्र भाजपच्या उद्याच्या राजकारणाचे चित्र या तीन निर्णयांनी स्पष्ट झाले आहे. त्याचा विचार आपण सर्वांनीच करावयास हवा. गुजरात हा अपवाद आहे. पण काँग्रेस जिवंत आहे व अनेक राज्यांतील मतदार काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहतात हे हिमाचलसारख्या राज्यात दिसून आले. दिल्लीच्या मनपा निवडणुका भाजपने प्रतिष्ठsच्या केल्या. तरीही ‘आप’ने तेथे 134 जागा जिंकून भाजपवर झाडू फिरवला. येथे काँग्रेस नावालाही उरली नाही. पण काँग्रेस व आप एकत्र आले असते तर आप व काँग्रेसने मिळून दोनशे जागा जिंकल्या असत्या. दिल्लीत एकेकाळी काँग्रेसचा जोर होता व शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिंकत होती. आज काँग्रेसकडे दिल्लीत नेता नाही. आश्चर्य असे की, जे ‘मोदी-शहा’ देश जिंकण्यासाठी चाणक्य नीती अवलंबतात ते प्रत्यक्ष दिल्लीची विधानसभा व महानगरपालिका जिंकू शकले नाहीत. प्रियंका, राहुल, सोनिया गांधी दिल्लीत असूनही तेथील महानगरपालिकेत 15 जागा काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत. मोदींनी गुजरात जिंकले, केजरीवाल यांनी दिल्ली आणि काँग्रेसने हिमाचल जिंकले! सामना बरोबरीत सुटला! असं म्हणत सामनातून निवडणुकांच्या निकालावर भाष्य करण्यात आलं आहे.

हिंदू मतदान! गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकल्या. हा आतापर्यंतचा गुजरातमधील विक्रम आहे. गुजरातमध्ये मतदान हे सरळ सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असेच झाले. गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेतील भाषणे काळजीपूर्वक पाहिली तर गोध्रा प्रकरणात अप्रत्यक्षपणे काय केले यावरच त्यांचे विवेचन असे. 1992 च्या मुंबईतील दंगलीत शिवसेनेने हिंदू रक्षणासाठी जी भूमिका बजावली तीच भूमिका गुजरातेत बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने बजावली. मोदी हे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण पुढे मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून मोदी यांनी गुजरातला आर्थिक व औद्योगिकदृष्टय़ा प्रबळ केले. मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र त्यांनी सरळ गुजरातेत नेले. डायमंड हबही नेले. अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून नेले व गुजरातची भरभराट केली. असा आरोपही राऊतांनी रोखठोकमधून केला आहे.

मोदी हे पंतप्रधान म्हणून फक्त गुजरातचेच हित पाहत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली तरी ‘मी प्रथम गुजराती’ ही भूमिका त्यांनी सोडली नाही. गौतम अदानी यांच्यामागे ते ठामपणे उभे राहिले व त्यांना जगातील तिसऱया क्रमांकाचे सर्वात श्रीमंत बनवले. ते गौतम अदानी हे गुजराती तरुणांचे आज ‘हिरो’ आहेत व काँग्रेस अदानी यांच्या विरोधात मोहिमा राबवत राहिली. अदानी व मोदींवरील टीकेचा काहीही उपयोग आप आणि काँग्रेसला झाला नाही. मोदींमुळे भाजपला गुजरातमध्ये हरवणे कठीण आहे. याचा अर्थ इतर राज्यांत भाजप अजिंक्य आहे असा नाही. हिमाचल व दिल्लीने ते दाखवून दिले. सवाशे वर्षांच्या काँग्रेसला लोक मरू देत नाहीत. ती या किंवा त्या राज्यात जिवंत होत असते. पंजाबचे राज्य गेले, पण बाजूच्या हिमाचल प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने ती अधिक ऊर्जावान होईल! असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे.

इतर राज्यांत का नाही? मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातेत भाजपास घवघवीत यश मिळाले. मोदी हे मोठे नेते आहेत व आता ते जागतिक ‘जी 20’ गटाचे अध्यक्ष झाल्याचा प्रचार गुजरात निवडणुकीत झाला. पण हे घवघवीत यश हिमाचल व दिल्लीत का मिळाले नाही? याचा विचार विरोधकांनी एकत्र येऊन करायला हवा. उद्या निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, कर्नाटक ही दोन्ही राज्ये काँग्रेस सहज जिंकेल. महाराष्ट्र तर भाजपने गमावला आहे. प. बंगाल, पंजाबात मोदी नाहीत. बिहारचे चित्र वेगळे दिसेल. लालू यादव हे किडनी बदलानंतर बरे होऊन सक्रिय होतील. फक्त उत्तर प्रदेश व गुजरात या दोन राज्यांवर भाजप भरवसा ठेवू शकेल. पण विरोधक एकत्र झाले तर या दोन राज्यांचाही फार प्रकाश पडणार नाही. झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड ही राज्ये लहान असली तरी बदल घडवू शकतील. 2024 साली राममंदिर पूर्ण होईल व तो मुद्दा प्रचारात येईल. पुन्हा समान नागरी कायद्याचे शंख फुंकायला सुरुवात झाली आहेच. कर्नाटक विधानसभा जिंकायच्या म्हणून सीमावादाने उग्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्र तोडण्याचे षड्यंत्र रचून केंद्र कर्नाटकास फूस लावत आहे. शेवटी निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचे, राष्ट्राचे नव्हे तर हेच विषय समोर आणले जातात. गुजरातेत वेगळे काय झाले? काँग्रेस आपला अपमान व अवहेलना करीत असल्याचे मोदी बोलत राहिले. त्यांच्या डोळय़ात पाणी येई. गुजराती लोक त्या पाण्यात विरघळून गेले, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

मोरबीच्या दुर्घटनेचा आक्रोश त्यात वाहून गेला. अशा वेळी पंतप्रधान मोदी नेहमीच जिंकतात! तसेच ते या वेळीही गुजरातेत जिंकले. गुजरातचा विजय मोठाच, पण हिमाचल, दिल्लीचा पराभवही तितकाच मोठा! पण चर्चा फक्त गुजरातची सुरू आहे, असही राऊत म्हणाले.

शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवून टाकू, अशी भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी केली. पण त्यांचे स्वतःचे राज्य ‘हिमाचल’ येथेच भाजपचा दारुण पराभव झाला. लोकांना गृहीत धरू नका, हा धडा महत्त्वाचा. गुजरातेत ‘आप’ने काँग्रेसची 13 टक्के मते खेचली. ‘आप’ला अवघ्या 5 जागा मिळाल्या. पण 13 टक्के मतांमुळे ‘आप’ आता राष्ट्रीय पक्ष होईल. यावरच ते लोक खूश. काँग्रेसचे पाय त्यामुळे कापले व भाजपचा मोठा विजय झाला. गुजरातेत काँग्रेस किमान पन्नास जागांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण ‘आप’ने भाजपला मोठ्या विजयाची संधी दिली, असा आरोपही राऊतांनी केला आहे.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण; कसा असेल पंतप्रधानांचा दौरा, वाचा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -