आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. भाजपसह ठाकरे गटानेही आता राज्यभरात बैठकांचा सत्र सुरु केले आहे. या निवडणुकांबाबत ठाकरे गटाने इच्छुक उमेदारांना ठणकावले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून अडीच हजार सदस्य नोंदणी केली तर तो उमेदवारीसाठी पात्र ठरेल. त्यानंतर कामाचा आलेख तपासला जाईल, मेरीटचा विचार केला जाईल, आता वशिलेबाजी चालणार नाही, असं स्पष्टचं शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. काल रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते.
या सभेत राऊत म्हणाले की, निवडणुका लवकरचं जाहीर होणार आहेत. पक्षाकडून सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आखला जात आहे. जे उमेदवारीसाठी उच्छूक आहेत त्यांनी राजापूर, रत्नागिरी, चिपळूणात जास्तीत नोंदणीसाठी प्रयत्न केले, तरचं उमेदवारीसाठी ते पात्र ठरतील.
पैसे कितीही टाकले तरी निवडणुका लढवता येतात असे आता राहिले नाही. कामे आणि पक्षाशी प्रामाणिक असलेल्यांनाच जनता विचार करेल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री महोदयांना स्वत:च्या मतदारसंघातच क्लिनबोल्ड होण्याची वेळ आली आहे. तिनं ग्रामपंचायतीत त्यांनी लोकांनी जागा दाखवून दिली, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.
शिंदे गटातील आमदारांवर भाष्य करत राऊत म्हणाले की, गद्दार पक्षातून बाहेर पडले आहेत. मंत्रीपद मिळावे यासाठी पक्षाशी त्यांनी बेइमानी केली. भविष्यात सगळ्यांचेच पितळ उघड होईल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नारळ खणखणीत आहे. त्याचा प्रत्यय अंधेरीच्या निवडणुकीत आला आहे. याचा भाजपनेही धसका घेतला आहे.
राज्यातील एक एक उद्योग बाहेर जात आहेत. उद्योग गेला की, उद्योगमंत्री पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहेत. त्यांना सांगणे आहे की, पाच महिने सत्तेत असून तुम्ही काही करु शकला नाहीत. कोरोनामुळे महाविकास आघाडीची दोन वर्षे वाया गेली. आत्तापर्यंत पाच प्रकल्प घालवण्याचे काम तुम्हीच केलेत. अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर लक्ष्य करत राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी शिंदेंनी महाराष्ट्र कर्जबाजारी आणि राज्य गुजरातकडे गहाण ठेवायचे ठरवले आहे. मुख्यमंत्री करा महाराष्ट्र खाली करतो असेच वचन त्यांनी दिले असावे, या परिस्थितीत हे सरकार औटघटकेचे आहे. ते चार महिनेही चालणार नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कंड्या पिकवल्या जात आहेत. आमदार राजन साळवी शिंदे गटात जाणार असे पसरवत संभ्रम निर्माण केला जात आहे, पण साळवी यांनी कंड्या पिकवणाऱ्यांच्या बारशाऱ्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत. ते ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे कंड्या पिकवणे आणि त्यांना बदनाम करणे सोडून द्या, असे सांगत जे काही करायचे आहे, ते उद्योग मुंबईत जाऊन करा असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.