नाशिक : शिवसेना (ठाकरे गट) खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपनेते तथा श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांचा ५९ वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रविंद्र पैठण गुरूजी तसेच गौतमी गोदावरी वैदीक गुरूकुल मधील २५ बटुक ब्राह्मणांच्या वेद मंत्रोच्चारात घरातील महिलांच्या हस्ते औक्षण करत अभिष्टचिंतन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर भिकुबाई बागूल, आमदार दिलीप बनकर, संजय सावंत, तुळशीराम गुट्टे महाराज, वसंत गिते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत यांनी बागूल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या भाषणातून अनेक विषयांना हात घातला. शिवसेनेचं आणि नाशिकचं एक वेगळं नातं आहे. शिवसेनेचे पहिले अधिवेशन हे नाशकात झाले आणि त्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली. म्हणून या नाशिकवर बाळासाहेब ठाकरेंच प्रेम होत, उद्धव ठाकरेंचं प्रेम आहे आणि आमच्या सर्वांचे देखील नाशिकवर प्रेम आहे. नाशिकची शिवसेना आजही मजबूत आहे आणि भविष्यात देखील अशीच मजबूत राहील यात शंका नाही. शिवसेना ही तरुणांची फौज आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर या देशात २८० सेना स्थापन झाल्यात पण फक्त दोनच सेना शिल्लक राहिल्या त्या म्हणजे भारतीय सेना आणि शिवसेना. त्यामुळे या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव कोणी करू शकणार नाही. शिवसेनेचे अस्तित्व संपून जावे शिवसेना नष्ट व्हावी यासाठी दिल्ली पासून गल्लीपर्यंत कारस्थान सुरु आहे. परंतु अशा कारस्थानांच्या छातीवर पाय देऊन उद्धव ठाकरे उभे आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः सध्या दिल्ली मुंबई ये – जा करत आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी परंतु मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि त्यासोबतच नाशिक व ठाणे महापालिकेवर देखील शिवसेनेचाच भगवा फडकेल. एखादा नेता जनतेशी मनापासून जोडल्याशिवाय अशा सोहळ्यांना गर्दी होत नाही आणि तो नेता शिवसेनेचा असेल तर गर्दी कमी पडत नाही.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर उपस्थित असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबतच्या पहाटेच्या शपथ विधीबाबत दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाला पकडत आमदार बनकर देखील त्या घटनेचे साक्षीदार आहात म्हणत एकप्रकारे फडणवीसांच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले. सध्या राज्यात राजकीय वातावरण बदलते आहे. या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात टाकलं. मी अजिबात खचलो नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मला दिल्लीच्या सर्वोच्च पदापर्यंत नेले त्या शिवसेनेसाठी देऊन टाकले. मला तुरुंगात कशी वागणूक मिळाली मी अजूनपर्यंत सांगितली नाही. मला माहिती आहे कि २०२४ साली सत्तेवर येईल आणि याची व्याजासकट परतफेड केल्याशिवाय मी राहणार नाही. रडायचं कशाला मर्दाची छाती आहे, वाघाचे काळीज आहे भीती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. तुरुंगात हसत हसत हा बघावा फडकावत गेली आणि बाहेर आलो तेव्हाही असाच बघावा फडकावत आलो. आजकाल शिवसेना फोडण्यासाठी पैश्याची आमिष दाखवली जात आहे माणसे विकत घेतली जात आहे.
ज्यावेगाने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित झपाट्याने पणे पुढे जात आहे ते पाहिल्यावर माझ्या मनात अजिबात शंका नाही की, २०२४ साली फक्त नाशिकचं काय तर संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना नाशिक शहरात आणि जिल्ह्यात जी वाढत गेली ती बाळासाहेबांच्या निष्ठावान आणि कडवट सुनील बागूल यांच्या सारख्या शिवसैनिकामुळे. सुनील बागूल यांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिवसेनेवर सुनील बागुल यांची एक छाप पडलेली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आपली जबाबदारी अधिक असून पंचवटीसह शहरातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. झाडावरील काही पान गळून पडत असतात तशी नाशिक मधील काही पान गळून गेली आहे, अशी पानी गळून गेल्याशिवाय नवीन बहर येत नाही. आजही जी माजी नगरसेविका गेली तिला काही तरी आमिष दाखवून घेऊन गेल्याचे कानावर आले. त्यामुळे अशी पान गळाल्यानंतरच नवीन बहर येतांना सध्या मला नाशिकमध्ये दिसत आहे.
यावेळी शुभांगी पाटील, शोभा मगर, मंगला भास्कर, भगवान पाठक, डि.जी. सूर्यवंशी, मामा राजवाडे, करण गायकर, विलास शिंदे, सचिन राणे, दीपक केदार, देवानंद बिरारी, निखिल पवार, प्रदिप पताडे, बाळा दराडे, योगेश पाटील यांच्यासह शिवसेनेसह इतर राजकीय पक्षाच्या जिल्हा व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बागूल, अजय बागूल, किशोर बागूल, निखिल बागूल, गुलाब भोये, मनिष बागूल, राजेंद्र वाकसरे, बाळासाहेब कोकणेंसह समर्थकांनी मेहनत घेतली.