मराठा आरक्षणासंदर्भातील शिवसेनेची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली. पण मराठ्यांना आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घेण्याची गरज आहे. असे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी शिवसेना आग्रही असून शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. मागील वर्षा- दोन वर्षामध्ये मराठा समाजाने शांततेने मोर्चे काढले. त्यानंतर देखील निराशा झाल्यानं मराठा आता आक्रमक झाला आहे. आंदोलन करताना मराठा समाजानं संयम राखावा असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले. ज्यावेळी मराठा समाजाने शांततेमध्ये मोर्चे काढले तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागायला हवा होता. तर, आरक्षणाचा विषय हा कोर्टाच्या अखत्यारित येतो का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विधीमंडळानं निर्णय घ्यावा. विशेष अधिवेशनामध्ये सर्वपक्षीयांनी एकमतानं निर्णय घेत त्यासंबंधीचा अहवाल हा केंद्राकडे पाठवावा असे देखील उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठी माणसांमध्ये जातीच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. मराठी माणसामध्ये भांडणे नकोत. एकी हवी असे आशा यावेळी उद्धव म्हणाले. तसचे मराठ्यांना आरक्षण देताना मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहण्याची गरज नसल्याचे देखील उद्धव यांनी यावेळी म्हटले. आरक्षणाचा विषय आता कोर्टात गेला आहे. पण हा कोर्टाचा विषय नसल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.
आरक्षणावरून मराठा आक्रमक
५८ वर्षे मुक मोर्चा काढल्यानंतर देखील मराठा समजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तती झाली नाही. परिणामी मुक मोर्चाचे ठोक मोर्चामध्ये रूपांतर झाले. राज्यभर मराठा आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी मोडतोड आणि तोडफोड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील महिनाभरात आरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.