कल्याण लोकसभा मतदारसंघाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या मतदारसंघात भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच भाजपने चाचपणी सुरू केल्याचं देखील बोललं जातंय. परंतु यामध्ये अजित पवार गटही सक्रिय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही येथील मतदारसंघासाठी लॉबिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नावरून खासदार श्रीकांत शिंदे पत्रकारांवर भडकल्याचं पाहायला मिळालं.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या समन्वयावर भाष्य केलं. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे तुमच्या कल्याण लोकसभा मतदार संघावर डॉमिनेटींग होतंय का? असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही माझ्या मतदारसंघाची काळजी करू नका.
आगामी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिल्लीतील वरिष्ठ नेते पीएम नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून सर्वच वरिष्ठ नेतेमंडळी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे आता यावर विनाकारण चर्चा करण्यात अर्थ नाही. तिन्ही पक्षामध्ये समन्वय आहे. नेत्यांमध्येही समन्वय आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
कल्याण लोकसभा मतदार संघाकडून भाजप ही जागा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडूनही कोण उमेदवार देण्यात येईल, हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे.