पुणेः गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, नाशिकसह दहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तेथील शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १९ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसारीत करण्याचे आदेशही राज्य शासनाने संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने जाहिर केलेल्या नुकसान भरपाईचा लाभ दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत शिंदे सरकारने जाहिर केली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, नाशिकसह दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव पुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे आला होता. त्यावर निर्णय घेत राज्य शासनाने ही मदत जाहिर केली.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव अहमदनगर व नंदुरबार येथील शेतकऱ्यांना या शासन निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल, असे आदेशही शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहेत.
गेल्या वर्षी सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहिर केल्या. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे बळीराजाला एकटे सोडणार नाही, असेही शिंदे-फडणवीस सरकारने जाहिर केले होते. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच हजार कोटींची मदत जाहिर केली. त्यानंतर पुरवणी मागणीनुसार शिंदे सरकारने नव्याने मदत जाहिर केली आहे.