एसटीच्या प्रवासामध्ये करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे करोना विषाणूची लागण प्रवाशांना होवू नये, यासाठी एसटी महामंडळ सर्वप्रकारची दक्षता घेत आहे. राज्यभरात एसटी महामंडळाने लांबपल्याच्या महामार्गावर एसटी प्रवाशांसाठी असलेल्या अधिकृत हॉटेलवर प्रवाशांचा जेवणासाठी थांबा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे राज्यभरातील महामार्गावर असलेली सुमारे 50 हॉटेल बंद होणार आहेत. त्यामुळे आता एसटी प्रवाशांचा प्रवास उपाशी होणार आहे.
राज्यभरातील एसटी महामंडळाचा महसूल वाढावा आणि सोबतच एसटीच्या प्रवाशांना जेवणाची व नाश्ताची उत्तम सुविधा मिळावी यासाठी राज्यभरात अधिकृत हॉटेलांमध्ये प्रवाशांसाठी एसटीला थांबे देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाकडून राज्यभरात लांबपल्ल्याच्या प्रवाशांसाठी एसटी बसेस वेगवेगळ्या आगारातून, डेपोतून सोडल्या जातात. त्यासाठी महामार्गावर येताना आणि जाताना दोन्ही मार्गांवर हॉटेल निश्चित केले आहेत. त्याच हॉटेलवर एसटी बसेस थांबवल्या जातात. बस थांबल्याबाबत हॉटेल व्यावसायिकाकडून वाहक पास भरून त्यावर सही व शिक्का घेतात.
तो पास संबंधित आगारात जमा करावा लागतो. त्यावरून बस अधिकृत हॉटेलवर थांबवल्याची नोंद घेतली जाते. अशा सुमारे 8 हजार एसटी बसेस महामार्गावर दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी थांबा घेतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी प्रवाशांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे एसटीचे हॉटेलवर प्रवाशांच्या जेवणासाठी थांबा आता बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करत असताना उपाशी प्रवास करावा लागणार आहे.
या मार्गांवर होणार परिणाम
एसटी महामंडळाच्या सर्वाधिक लांबपल्ल्याच्या गाड्या या मुंबई- पुणे,ठाणे- नगर, मुंबई- नाशिक, मुंबई- सोलापूर,मुंबई- कोल्हापूर, मुंबई- रत्नागिरी अशा धावतात.या मार्गांवर प्रवासी संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रवासात अधिकृत हॉटेल्स बंद केल्यामुळे प्रवाशांची जेवण्याची आणि नाश्त्याची गैरसोय होणार आहे. मात्र या लांबपल्ल्यांचा गाड्यांतील प्रवाशांना बस पकडणार पुर्वी याची सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात येणार आहे.