अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाल्याची आवक बाजारात घटली आहे. त्यामुळे ऐन श्रावणांच्या उपवासाच्या काळात भाव कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे. तर महिलावर्गाचे यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
पुराने घातलेले थैमान तर काही ठिकाणी पाण्याचा अभाव अशा द्विधा स्थितीत शेतकरी अडकला आहे. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. विविध रोगांच्या प्रभावानेही भाज्यांची आवक कमी असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. खोपोली महात्मा फुले भाजी मंडईत भाजीचे भाव गगनाला भिडले आहेत.तर किलोचे भाव भेंडी 80 रु, फ्लॉवर 60रु, वांगी 60रु, वटाणा 60रु, गवार 60रु, फरसबी 60रु, तर मेथी, शापू 20रु रुपये जुडी असे झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत.
अतिवृष्टी, पूर, भाजीपाल्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांची आवक कमी असल्यामुळे भाव कडाडले आहेत.
-मयूर पोखरकर, घाऊक व्यापारी, महात्मा फुले भाजी मंडई, खोपोली