आगमी लोकसभा निवडणुकीसाठी जसे सर्वच पक्ष कामाला लागले असून, आता निवडणुक आयोग देखील जोरदार कामाला लागले आहे. त्यामुळे राज्यात आता सर्व मतदान केंद्रावर मतदानाची पावती देणारी व्ही.व्ही.पॅट (Voter-verified paper audit trail) यंत्रणा राबवण्यात आली आहे. आतापर्यंत ३७ लाख मतदारांनी याची चाचपणी केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. लवासा यांच्यासह अन्य दोन आयुक्तांनी २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनतर लवासा हे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
३६ जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
राज्यातल्या सर्व यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या दोन दिवसात चर्चा झाली आहे. पोलीस, उत्पादन शुल्क, महसुल आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर राज्यातल्या ३६ जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशीही निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आल्याचे लवासा यांनी यावेळी सांगितले. राज्यात एकाच वेळी लोकसभा निवडणूक घेणे शक्य आहे. तशी तयारीही आहे. पण मतदारांना सोयी सुविधा आणि सुरक्षा पुरवून सुसूत्र मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी विविध चरणात मतदान घेतले जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काही राजकीय पक्षणी प्रचाराला धरून काही सूचना केल्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरच ही प्रक्रिया पार पाडली जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पार्श्वभूमीबाबत स्थानिक वर्तमान पत्रात तीन वेळा माहिती देणे बंधनकारक आहे. तसे न केल्याची तक्रार दाखल झाल्यास संबंधीत उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराला निर्बंध घालण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवरही आयोगाचे लक्ष असणार आहे. न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मतदानाच्या दिवशी उमेदवारांना वर्तमान पत्रात जाहिरात देता ही येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
ऑनलाईनची कुठलीही सुविधा नाही
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन मतदान करण्याची कुठलीही सुविधा नसणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन मतदानाविषयी समाज माध्यमात खोटी माहिती पासरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक बुथ वर ‘व्ही.व्ही.पॅड’ चा वापर मतदानासाठी करण्यात येईल. मतदार यादीत बोगस नावे असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेऊन संबंधित विभागाला तपासणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत असेही लवासा यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशीलचंद्रा ही उपस्थित होते.
हेही वाचा – लोकसभेपूर्वी राज्यात ५५७ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
हेही वाचा – श्रेयवादावरून निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादीत गटा तटाचे राजकरण