मुंबई : सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ, नियमित देण्यात येणारी नुकसनाभरपाईची रक्कम 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिले होते. मात्र, अद्याप त्याची पूर्तता न झाल्याने नुकसानभरपाई यंदाच्या मार्चअखेर देणार की पुढच्या वर्षीच्या? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला आहे.
सातत्याने होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पैसे नऊ महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. मार्चअखेर हे पैसे देण्याचं आश्वासन स्वाभिमानी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पण आता एप्रिल महिना अर्धा संपला तरी नुकसानभरपाई मिळाली नाही.
मग यंदाच्या… pic.twitter.com/EcGu8DjYbk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2023
सततच्या पावसामुळे होणारे नुकसान, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभ आणि इतर नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 755 कोटींचे वाटप झाले. यासाठी अतिरिक्त 3300 कोटींची मागणी आली आहे. या मागणीची वैधता तपासून कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, नियमितपणे देण्यात येणारे नुकसानभरपाईपोटी 6800 कोटींपैकी सहा कोटींचे वाटप झाले आहे. 800 कोटींचे वाटप राहिले आहे. तर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासही सुरुवात झाली असून एकाच दिवशी 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना एका क्लिकवर अडीच हजार कोटी कॅबिनेटमधून देण्यात आले आहेत, असी माहिती दिली.
आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचा व्हिडीओ शेअर करत, सातत्याने होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पैसे नऊ महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ‘मार्चअखेर हे पैसे देण्याचे आश्वासन स्वाभिमानी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले; पण आता एप्रिल महिना अर्धा संपला तरी नुकसानभरपाई मिळाली नाही. मग यंदाच्या मार्चअखेर देणार की पुढच्या वर्षीच्या? असंही विचारायला पाहिजे होतं का आम्ही मुख्यमंत्री महोदय? शिवाय अजूनही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठं नुकसान झालंय. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, ही विनंती, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.