मंगळवार (ता. 18 एप्रिल) पासून मंत्रालयातील (Ministry) इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने याचा कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (ता. 19 एप्रिल) देखील मंत्रालयात इंटरनेट सेवा बंद असल्याने मंत्रालयाच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळत आहेत. तसेच, याचा परिणाम पास सेवेवर देखील झाल्याने लोकांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे. दोन ते तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर नागरिकांना पास उपलब्ध होत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याच्या अनेक भागातील हजारो नागरिक दररोज मंत्रालयामध्ये कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त येत असतात. पण या ठिकाणची इंटरनेट सेवा ठप्प झाल्याची माहिती नागरिकांना नसल्याने नागरिकांनी मंत्रालयाच्या बाहेर पास मिळवण्यासाठी एकच गर्दी केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आल्याने सध्या असलेल्या सरकारचे काहीही होऊ शकते, या कारणामुळे देखील नागरिक आपली कामे उरकण्यासाठी घाई करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेक नागरिक हे मेटाकुटीला आलेले आहेत. ज्यामुळे शासनाचे सुशासन पूर्णतः कोलमडलेले असल्याचे म्हणत मंत्रालयात आलेल्या दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नागरिकांना रणरणत्या उन्हात ताटकळत उभे ठेवण्यापेक्षा डिजिटल पासची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
परंतु, कार्यालयातील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या ट्विटने राजकीय वर्तुळात आता भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय आहे. या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ऑफिस वर्क, हॅशटॅग क्लिअरिंग्स पेंडिग्स, कार्यालयीन कामकाज, असे या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलेले आहे. कार्यालयीन प्रलंबित कामकाज मार्गी लावताना असे देखील फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फाईल्स दिसत आहेत. या सर्व फाईल्सवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. पण त्यांना त्यांच्या या ट्विटच्या माध्यमातून काही इशारा द्यायचा आहे का? अशी चर्चा सुद्धा करण्यात येत आहे.
हेही वाचा – मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा; काय आहे कारण ?