मणिपूर मधील दोन महिलांसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली गेली आहे. या व्हिडिओत दोन महिलांना विवस्र करुन त्यांची धिंड काढली गेली. या व्हायरल व्हिडिओवर राजकीय नेते, कलाकार आणि देशभरातील लोकांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज चौथा दिवस आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे. 77 दिवस या गोष्टी दाबून कशाकाय राहू शकतात. काल रात्री तो व्हिडीओ बघितल्यानंतर एकच धक्का बसला. हे केंद्र आणि राज्य सरकार निर्लज्जपणाने वागत आहे. महिलांच्या विषयी या लोकांना काहीही गांभीर्य नाहीये. महिलांची सुरक्षा ही त्यांची जबाबदारी नाही आहे का?, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.
मणिपूरमध्ये भाजपाचं नाही तर हैवानांचं राज्य आहे. हे सर्व सत्य लपवून ठेवलं आहे. दोन महिने उलटून गेले तरीही पीएम मोदी यावर काहीही बोलत नाही. आज ही क्लिप समोर आल्यानंतर ते दोन शब्द बोलले. खरं म्हणजे पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. आपण भारतात राहतो, जेव्हा जेव्हा महिलांवर अशाप्रकारे गलिच्छ अत्याचार झालेले आहेत, त्या वेळेला महाभारत झालेलं आहे. हे जे सत्तेत बसले आहेत, ते पूर्णपणे बेजबाबदारीने वागत आहेत. त्यांना त्यांच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत आणि राजीनामे दिले पाहिजेत. तसेच या देशात महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा : Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या विवस्र व्हिडीओप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक