मुंबई मेट्रो रेल्वे कारशेडसाठी आरे येथील हजारो झाडांच्या कत्तलीसाठी आरेमध्ये संचारबंदी जाहीर करून आरे परिसर पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड म्हणाले. नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालवल्या असल्याची टीका त्यांनी केली.
ऑक्सिजनच्या अभावामुळे गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचं गोरखपूर करायच्या वाटेवर आहे. असे आव्हाड म्हणाले. मी दुपारी तीनच्या सुमारास तिथे पोचलो तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत याची खात्री पटली. आमदारकीचा तोरा मिरवण्यात अर्थ नव्हता. पोलीस बिचारे वरून आलेल्या हुकुमाला बांधील होते. माझं नशीब चांगलं की त्याच वेळी जंगलातल्या आदिवासी पाड्यामध्ये राहणारी एक महिला आमच्या मदतीला धावली.
पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आम्ही जंगलात प्रवेश केला, असे आव्हाड म्हणाले. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला तेव्हा मला आणि माझ्या सहकार्यांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढल्याचे आव्हाड यांनी सांगितले.