मुंबई महापालिका रस्त्यांवरील भिकाऱ्यांसाठी निवारास्थाने उभारते. भिकाऱ्यांच्या जेवण, पाणी, विश्रांती यांची व्यवस्था करते. मात्र तरीही पालिकेच्या रस्त्यांवर भिकारी भिक मागताना आढळून येतातच. पालिकेने रस्त्यावरील भिकाऱ्यांचा बंदोबस्त करून मुंबईतील रस्ते, चौक लवकरात लवकर भिकारीमुक्त करावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी उपस्थित केला आहे.
जर पालिकेला भिकाऱ्यांची समस्या सोडविणे जमत नसेल तर त्यांनी भाजपला ती जबाबदारी द्यावी, अशी मागणीही कमलेश यादव यांनी यावेळी केली. भाजप आवश्यक उपाययोजना करून संपूर्ण मुंबईतील भिकाऱ्यांची समस्या आपल्या हिमतीवर सोडवून दाखवेल. फक्त त्याबाबतचे अधिकार पालिकेने आम्हाला द्यावेत, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सन २०२२ – २३ या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नगरसेवक कमलेश यादव यांनी वरीलप्रमाणे पालिकेला जाब विचारत व फैलावर घेत मागणी केली आहे. कांदिवली येथील एमजी रोड येथील एका तीन मजली शालेय इमारतीत शाळा बंद करून त्या जागेत बेघर लोकांसाठी आश्रय व निवारा स्थान उभारण्यात आले. तेथे पालिकेने भिकारी, बेघर लोकांसाठी जेवण, पाणी, वीज सर्व प्रकारची व्यवस्था केली. मात्र तरीही तेथील रस्त्यांवर ठिकठिकाणी भिकारी भीक मागताना दिसून येतात. तर काही भिकारी मोबाईल, पैसे यांची चोरी करताना आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेने बेघर, भिकारी लोकांसाठी चांगली व्यवस्था केली असूनही व त्यासाठी बऱ्यापैकी निधी खर्चूनही मुंबईत ठिकठिकाणी भिकारी आढळून येत आहेत, अशी खंत नगरसेवक कमलेश यादव यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबईतील भिकाऱ्यांच्या उपद्रवाबाबत पालिकेला जाब विचारला तर ते पोलिसांना अधिकार असल्याचे सांगत हात वर करतात. मात्र कुठे चिरीमिरी मिळत असेल तर तिकडे मात्र संबंधित अधिकारी लक्ष देतात, असा टोमणा कमलेश यादव यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना मारला आहे. वास्तविक, भिकाऱ्यांची समस्या सोडविण्याची इच्छाशक्तीच पालिकेत नाही. भिकऱ्यांची समस्या पालिका स्वतः सोडवत नाही. आम्ही ही समस्या सोडविण्याची व त्यांची सर्व व्यवस्था पाहण्याची जबाबदारी घेतो, पण पालिका तेही करीत नाही. त्यामुळे भिकऱ्यांची समस्या म्हणजे भिजत घोंगडे झाले आहे, अशी टीका नगरसेवक कमलेश यादव यांनी यावेळी केली.
हेही वाचा : ठाणे खाडी क्षेत्राला मिळणार रामसर स्थळाचा दर्जा; राज्य सरकारने केंद्राला पाठवला प्रस्ताव