पुलवामा हल्ल्याचे तीव्र पडसाद सर्वच क्षेत्रात उमटत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही या हल्ल्यामुळे कमालीची नाराजी आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील निर्माते एकवटले असून त्यांनी पाकिस्तानात आपले चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सिनेक्षेत्राचे जवळपास १०० कोटींचे नुकसान येणार्या काळात होणार आहे. शिवाय पाकिस्तानातील प्रेक्षकांकडूनही भारतीय सिनेमांना पसंती दिली जाते. मात्र या निर्णयामुळे येथील चित्रपटगृहांतील प्रेक्षकांची संख्या कमी होणार असून त्याचा फटका तेथील तिकिटबारीला बसणार आहे.
भारतातील चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्याचे प्रमाण मोठे आहे. पाकिस्तानातील सिनेसृष्टीचा निम्म्याहून अधिक वाटा भारतीय चित्रपटांनी व्यापलेला आहे. त्यामुळे बॉलिवूडकडून पाकिस्तानला हा मोठा धक्का दिला जाणार आहे. या निर्णयामुळे भारतीय चित्रपट निर्मात्यांचेही नुकसान होणार आहे. मात्र ते पाकिस्तानातील सिनेक्षेत्राच्या नुकसानाच्या तुलनेत खूपच कमी आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधील चित्रपटक्षेत्र आणि थिएटरमालकांचे मोठे नुकसान होणार आहे. शिवाय पाकिस्तानातील कलाकार, गायकांनाही बॉलिवूडचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे भारतातून मिळणार्या मोठ्या मानधनाला या कलाकारांना मुकावे लागणार आहे.