शहरांचे योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात मोठ्या समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे. राज्यातील शहरांचा विकास होतो, तसाच ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणे ही शहरांप्रमाणे उदयास येऊ लागली आहेत, हे तथाकथित शहरे मात्र नियोजनाशिवाय वाढत आहेत. या बदलाचा थेट ग्रामीण भागावर परिणाम होऊ लागला, विशेष म्हणजे कृषी क्षेत्रावर परिणाम होऊ लागला आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याच्या स्त्रोतावर परिणाम झाला आहे. त्यामुळे साहजिकच कृषी क्षेत्राचे नुकसान होऊ लागले आहे, असा निष्कर्ष आयआयटीचे सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक टी.आय. एल्डो यांनी काढला आहे. परि शहरीकरणाच्या दृष्टीकोनातून अभ्यास होणे गरजेचे आहे. अनेकदा शहर व्यवस्थापन समस्यांचा एक भाग म्हणून हा अभ्यास केला जातो असे मत त्यांनी मांडले आहे.
आयआयटीच्या अभ्यासामध्ये शेती हे उपजिविकेचे साधन म्हणून स्वीकारण्यात घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. २००१ साली जिथे २० टक्के लोकांच्या उपजिविकेचे मुख्य साधन शेती होते तिथेच २०११ सालापर्यंत ९ टक्के लोकच शेती करत असल्याचे आढळून आले. खाजगी कंपन्यांमार्फत शेतजमीनीची खरेदी तसेच वीट भट्ट्यांचे वाढलेले उद्योग यामुळे शेतीचा पर्याय सोडून अनेकांनी इतर व्यवसायासाठी पसंती दिली आहे. वीट भट्ट्यांसाठी पाण्याचा वापर अवाजवी पद्धतीने होतानाच पर्यावरणावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान या परिसरात होत असतानाही भूजल पातळी कमी होण्यासाठी वाढते शहरीकरणच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणच्या विहिरी कोरड्या पडतानाच पाण्याचे प्रवाहसुद्धा बंधारे बांधून अडवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या सर्वेक्षणासाठी कर्जतमधील माणगाव तर्फ वसारे, मूळगाव तर्फ वसारे, कोंढाणे आणि साल्पे या चार गावांचा अभ्यास करण्यात आला आहे. ४० जणांच्या सर्वेक्षणातून हा अहवाल मांडण्यात आला आहे.