नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या बंडाचे लोण आता काँग्रेसमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सावधगिरी बाळगत डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर कमल नाथ तातडीने मुंबईत पोहचले असून त्यांनी यावेळी आपलि भूमिका स्पष्ट केली.
कमलनाथ काय म्हणाले –
अरुणाचल प्रदेश, झारखंड या सगळ्या ठिकाणी असेच प्रयत्न झाले. हा संविधानाचा खिलवाड असून मी हे सगळे खूप पाहिले आहे. माझा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत एकता राहील. उद्या नंतर परवा येतो. हे सगळे पैसा आणि पोस्टचे राजकारण आहे. या सगळ्यात काँग्रेस शिवसेनेसोबत आहे, शिवाजी महाराज के प्रदेश को कलंकीत नही करेंगे, असे कमलनाथ म्हणाले.
४४ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात –
महाराष्ट्रात बंडखोर नेत्यांमुळे सरकार संकटात सापडल्याचे स्पष्ट होताच सोनिया यांनी कमल नाथ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतरच कमल नाथ यांच्यावर महाराष्ट्राचे निरिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात कमल नाथ महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेत्यांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने त्यांचे सर्वच्या सर्व ४४ आमदार हे बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले.