मंत्री एकनाथ मंत्री यांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून ३५ पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. पण जर मला शिवसेनेने उमेदवारी दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती, असं संभाजीराजे म्हणाले.
मागील २ वर्षांपासूनच एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मी सुद्धा बघतोय, काय निर्णय येतो बघू, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
ज्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण गेलं, त्यावेळी बऱ्याच लोकांना वाटत होतं की, महाराष्ट्रात दंगल व्हावी. पण मी समाजाचं हित पाहिलं, मी कुणाच्या बरोबर आहे हे न बघता त्या स्टेजवर गेलो आणि समाजाला शांत केलं. मी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले आहे आणि बहुजन समाजाच्या हितासाठी काम केलं, असं संभाजीराजे म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी खूप प्रयत्न केला होता. परंतु अपक्ष म्हणून नाही तर शिवसेनेत प्रवेश करा, अशी अट टाकल्याने छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यानंतर कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या गटात अजून एका आमदाराचा समावेश, मुंबई व्हाया गुवाहाटीकडे रवाना