अहमदनगर ः मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा या ना त्या कारणाने चांगलाच चर्चेत राहत आहे. आता अमहदनगर जिल्ह्यातील राहाता येथेही काहीसे चर्चा घडणारेच घडले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे हे येणार म्हणून चार दिवसांपासून तयारी केली होती. मात्र, अमित ठाकरेंनी 20 सेकंदच वेळ दिल्याने चिडलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच लावलेल्या फलकावरील जिलेटीन कागद स्वतःच फाडून संतप्त भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नव्याने मोट बांधून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांचा हा दौऱ्या वेगवेगळ्या कारणाने चर्चिल्या जात आहे. त्यातीलच एक म्हणजे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा अपमान झाल्याने नाशिकच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. त्यानंतर अहमदनगरला गेलेल्या अमित ठाकरेंना त्यांच्याच पक्षातील कार्यर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
यामुळे चिडले मनसेचे कार्यकर्ते
अमित ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्राचा संपर्क दौरा केला. त्यासाठी नगर जिल्ह्यातही आले होते. नगर शहरातील एका महाविद्यालयात त्यांनी भेट दिली. तेथील कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते शनिशिंगणापूरला गेले. शनिशिंगणापूर दर्शन घेतल्यावर रात्री उशीरा अमित ठाकरे पुढील प्रवासाला निघाले. नियोजनानुसार ते राहाता येथे थांबणार होते. त्यासाठी चार-पाच दिवस आधीच कार्यकर्ते कामाला लागले होते. ठाकरे यांच्या उपस्थित काही कार्यक्रम करण्यात येणार होते. मंदिरात जाऊन दर्शन, फलकाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांशी चर्चा असे कार्यक्रम होते. प्रत्यक्षात अमत ठाकरे यांना तेथे पोहोचण्यासाठी खूपच उशीर झाला. त्यामुळे त्यांना कार्यक्रमासाठी थांबण्यास, देवदर्शन घेण्याचेही टाळले. काही सेंकद थांबून कार्यकर्त्यांना नमस्कार करून ते पुढील दौऱ्याला शिर्डीकडे रवाना झाले.
कार्यकर्त्यांनी फाडला फलकावरील जिलेटीन कागद
मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे येणार म्हणून नगर जिल्ह्यातील राहाता येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी चार दिवसाआधीपासून विविध कार्यक्रमाची तयारी केली होती. मात्र, अमित ठाकरेंना कार्यक्रमस्थळी यायलाच खूप झाला. ते आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना नमस्कार करीत पुढे निघून गेले. त्यामुळे चिडकलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी उदघाटनासाठी तयार केलेल्या फलकावरील जिलेटीन कागद स्वतःच फाडून टाकला.