आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा संघटनांचे मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन अजूनही सुरू आहे. आज मुंबईमध्ये देखील या आंदोलनाचे पडसाद उमटले. परळ येथे गेल्या ५ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार अजूनीह लक्ष देत नसल्याचा आरोप करत मराठा संघटनांनी आज मुंबईच्या भारतमाता चित्रपटगृहासमोर आज सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी देत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असे सांगितले. ७२ हजार नोकर भरतीत मराठ्यांना डावलण्यापासून ते शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
५८ मोर्चे काढूनही सरकार झोपलंय
मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी ५८ मूक मोर्चे काढले. तरी देखील सरकारला जाग आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गेले २ वर्ष संयमाने ही लोकचळवळ चालवून देखील सरकारला जाग येत नसेल तर समाजाने कोणता मार्ग निवडायचा असा सवाल आंदोलकांनी केला.
सोलापूर-लातूरमध्ये चक्काजाम
विशेष म्हणजे शांततेत मूक मोर्चा काढूनही पदरात काहीच न पडल्याने मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी तर सोलापुरातील शिवाजी चौक आणि संभाजी चौक येथे आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर लातूरमध्येही या ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोलापूर बार्शी मार्गावर लोकमंगल महाविद्यालय परिसरात वडाळा, गावडी दारफळ येथे अज्ञातांनी दोन एसटी पेटवून दिल्या. तर एक एसटी फोडली.