मुंबईत पावसाचे आगमन झाले की दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुनरुज्जीवन होते. बघताबघता त्यांची संख्या वाढते आणि ते मुंबईकरांच्या जीवावर उठतात. त्यांची उत्पत्ती रोखण्यास सरकार, प्रशासन अपयशी ठरते. यावेळी मात्र या खड्ड्यांच्याविरोधात मराठी कलाकारांनी आवाज उठवला आहे. अभिनेता सुबोध भावे, अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात सोशल मिडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ’हे जग एक खूप मोठ्ठा खड्डा असून तो भरुन काढण्यासाठी जो कर भरावा लागेल त्यासाठी माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. खड्डे भरताना त्यासाठी लागणारी खडी, खडकापासून आणि खडक थेट डोंगराकडून घेत घेत एके दिवशी पृथ्वीवरुन सर्व डोंगर नाहीसे होऊन कर भरणारा आणि कर घेणारा यांच्या पुढील पिढ्या भुईसपाट झालेल्या या जगाच्या पाठीवर “चेंडू फळी” चा आनंद लुटतील..’
तर प्रशांत दामले यांनी कल्याण रस्त्यांवरील खड्ड्यांवर निशाणा साधला आहे. दामले यांनी कल्याणमधील नाट्यरसिकांचे कौतुक केले आहे. पण कल्याणमधील रस्ते थर्ड क्लास असल्याचे म्हटले आहे.
तर अभिनेता सुबोध भावेने खड्ड्यांमुळे त्याच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद प्रसंग सोशल मिडियावर शेअर केला आहे. गेल्या आठवड्यात सुबोधच्या भावाचा तर मागील रविवारी खड्ड्यांमुळे सुबोधच्या एका डॉक्टर असणार्या मित्राचा जीव गेला. कारण तेच खड्डे, बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळणे यामुळे. हे सगळे दहशतवादी आहेत असे सुबोधने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्याने सगळ्यांना घरच्यांवर प्रेम करत असाल तर गाडी चालवताना नियम पाळा, कारण कोणीतरी तुमची वाट पाहते आहे आणि तुमची काळजी करत आहे, अशी विनंती देखील त्याने केली आहे.