साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स (SEIC) 2022 आज आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फरन्सला केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) उपस्थित होते. साखर आणि संबंधित उद्योगांसाठी बातम्या आणि माहिती देणारे पोर्टल, ‘चिनीमंडी’द्वारे (Chinimandi) ही परिषद आयोजित करण्यात आली होती. देशांतर्गत आणि जागतिक साखर व्यापारातील प्रमुख आव्हाने आणि जोखीम प्रतिसाद धोरणे आणि साखर उद्योगाच्या भविष्यातील मार्गावर चर्चा करण्यासाठी आघाडीच्या आणि जागतिक उद्योग तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणणे आणि आणि भारतात अधिक नाविन्यपूर्ण आणि शाश्वत साखर आणि इथेनॉल क्षेत्र तयार करण्यासंबंधी उहापोह करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश होता. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी भारताला उर्जा निर्यात करणारे राष्ट्र बनवण्याची गरज असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी वीज पुरवठादार बनले पाहिजे असे ते म्हणाले.
नितीन गडकरी यांनी हरित इंधनाकडे वळण्याची आणि कृषी क्षेत्राला ऊर्जा आणि वीज क्षेत्रात वैविध्य आणण्याची तातडीची गरज आहे . इथेनॉल, मिथेनॉल, बायोइथेनॉल, बायो-सीएनजी, बायोडिझेल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक हेच भविष्यातील इंधन आहे. ऊर्जा आयात करणारे राष्ट्र होण्यापासून आपण ऊर्जा निर्यात करणारे राष्ट्र बनले पाहिजे. आपल्याला फक्त धान्य पुरवठादार राहून चालणार नाही. सध्या आपल्याकडे धान्य मुबलक आहे आणि वीज तुटवडा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठादार बनवण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हाणाले. तसेच साखर कारखान्यांनी याचा गांभीर्याने विचार केल्यास हा कायापालट झपाट्याने होईल, असेही ते म्हणाले.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “इलेक्ट्रिक कार इतक्या प्रमाणात सादर केल्या जात आहेत की, एक ते दीड वर्षात पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार उपलब्ध होतील.”