पवई तलावातील जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक फवारणी केल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेच्या ‘एस’वार्डच्या सहाय्यक आयुक्त यांना नोटीस बजावत यापुढे रासायनिक फवारणी करण्यास मनाई केली आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पवई तलावाचे लाखो रुपये खर्चून सुशोभिकरण करण्यात येत आहे ; मात्र या तलावातील निर्माण होणारी जलपर्णी ही पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती.
मात्र कंत्राटदाराने जलपर्णी हटविण्यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रासायनिक औषधांचा वापर केला. त्यामुळे तलावातील मासे, मगरी यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते स्टॅलिन यांनी १४ सप्टेंबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ऑनलाईन तक्रार केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर रोजी पवई तलावाला भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर, १६ सप्टेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेच्या ‘एस’ वार्डचे सहाय्यक आयुक्त यांना तातडीने नोटीस बजावून तलावात रासायनिक फवारणी करण्यास मनाई आदेश जारी केले. या रासायनिक फवारणीमुळे जलचर पर्यावरणावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे मंडळाने नोटिशीत म्हटले आहे. या संदर्भात, भाजपचे आमदार योगेश सागर यांनी संताप व्यक्त केला आहे. पवई तलावातील जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक फवारणी करणे हेच शिवसेनेचे पर्यावरण प्रेम आहे का, असा सवाल करीत त्यांनी कंत्राटदार व त्याच्याशी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.