कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. ठाणे महापालिका चांगले काम करत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. १५ ऑगस्टनंतर शहरातील P1 व P2 नुसार ज्या आस्थापना सुरू होत्या त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केटस्, जीम आणि स्वीमिंग पूल बाबत आढावा घेवून त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनावर केल्या. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विसर्जन बुकिंग टाईम स्लॉट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने आखून दिलेल्या नियम तसेच कंटेनमेंट झोन व हॉटस्पॉट येथे घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने व्यापारी महासंघ,ठाणे यांच्या सदस्य मंडळींसोबत आज ठाणे मनपा मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. pic.twitter.com/LO2u85Nldd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 13, 2020
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या पाश्वीभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस खासदार राजन विचारे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदे यांनी कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, ही वस्तूस्थिती असली तरी प्रत्येकाचा जीव वाचवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच मास्क लावणे, योग्य अंतर राखणे, दुकानामध्ये काम करणाऱ्या सर्वांची चाचणी करणे या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे सांगून राज्य शासनाने, तसेच महापालिका प्रशासनाने ज्या अटी आणि शर्थी घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापाऱ्यांची असेल अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के असून रूग्ण दुप्पटीचा वेगही ९० दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे ३.५ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आला आहे.