मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यांनी खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा घेऊन उपायुक्त व साहाय्यक आयुक्त यांना विभागातील रस्ते व खड्ड्यांची पाहणी करून खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश दिले आहेत. (pothole free roads for Ganeshotsav Work started on war footing)
महापालिका रस्ते विभाग ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’ पद्धतीने व कोल्ड मिक्सचा वापर करून पारंपरिक पद्धतीने विविध रस्त्यावरील खड्डे भरण्यात येत आहेत. त्यामुळे या मोहिमेला वेग मिळाला आहे. विशेषतः सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्रीगणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात म्हणून मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव हा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालिका यंत्रणा कामाला लागली आहे.
अतिरीक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवारी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी केली व कामाचा आढावा घेतला. या गणेशोत्सव कालावधीत रस्ते परिरक्षणाच्या दृष्टीने सर्व संबंधित रस्ते अभियंत्यांना आणि कंत्राटदारांना देखील त्यांनी निर्देश दिले. या विशेष मोहीमेत, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने विविध रस्त्यावरील खड्डे कसे बुजविले जात आहेत, याची त्यांनी पाहणी केली. यावेळी, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) (प्रभारी) श्री. एम. एम. पटेल आणि संबंधित सर्व उपप्रमुख अभियंता देखील उपस्थित होते.
‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धती’ चा वापर करून रस्त्यावरील खड्डा भरल्यानंतर अवघ्या सहा तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल’, असे प्रशासनाने आश्वस्त केले होते. त्यानुसार मुंबई शहर विभागात ६९६ चौरस मीटर, पूर्व उपनगरांमध्ये ५६० चौरस मीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये ९५७ चौरस मीटर असे आतापर्यंत एकून २,२१३ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे खड्डे रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रचलित पद्धतीनुसार देखील खड्डे भरले जात आहेत, जेणेकरून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडू शकतील.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील गणेशोत्सव समन्वय समिती, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली होती. जोरदार पावसामुळे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे लवकरात लवकर भरावेत आणि गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याची विनंती गणेश मंडळांकडून करण्यात आली होती.
हेही वाचा – पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; भाडेदरात 4 रुपयांची वाढ