पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. गुरुवारी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ४० जवान शहीद झाले आहेत. या घटनेवर संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. देशभरातून या हल्लेचा निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची जबरदस्त किंमत मोजायला लावायची असा निर्धार आपण केला पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
‘४० च्या बदल्यात ४० हजार’
जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओचा सुरुवातीचा मथळा हा ‘पाकिस्तानला धडा शिकवा, ४० च्या बदल्यात ४० हजार’ असा आहे. या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध! शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची ताकद देवो ही प्रार्थना करायला हवी. पण, त्याचबरोबर पाकिस्तानला याची जबरदस्त किंमत मोजायला लावली पाहिजे, अशी सर्व भारतीयांची भावना आहे. राजकारण बाजूला ठेवूया. हे राजकारण बाजूला ठेवत असताना जो काश्मीरी तरुण पाकिस्तानचा निषेध करत होता, जो काश्मीरी तरुण दहशतवाद्यांचा विरोध करत होता, तो काश्मीरी तरुण आपला मार्ग का सोडतोय? याचं सुद्धा चिंतन झालं पाहीजे. आपल्या चुकलेल्या धोरणांमुळे हे घडत असेल तर ही धोरणं सुधरवली पाहीजेत. काश्मीरचा युवक हा भारताबरोबर असलाच पाहिजे ही भारताची भूमिका असलीच पाहिजे. जर हा काश्मीरी युवक जर चुकीच्या मार्गावर जात असेल त्याला पुनच्छ मुख्य प्रवाहात आणणं हे सर्व भारतीयांची आणि सर्व राजकारण्यांची जबाबदारी आहे. एकत्रित येऊन याचा विचार करणे जरुररीचे आहे. पण, त्याबरोबर हे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की, पाकिस्तानला आता धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही.’