महाराष्ट्रातील राजकारणाचे वादळ काही प्रमाणात शमले असताना राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळं धडकली आहेत. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणून सांगणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले नसले तरी पाऊस मात्र मुंबईत पुन्हा आला. होय अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावत असल्याने त्याचा परिणाम आज मुंबईकरांनासुद्धा जाणवला. आज सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.
प्रशासनाला सतर्कतेचा इशारा
आज सकाळपासूनच मुंबईतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. परिणामी सकाळीच कार्यालय, शाळांसाठी निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. दरम्यान अरबी समुद्रामध्ये आगामी २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांसह उर्वरीत महाराष्ट्रात आज (गुरूवारी) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ‘स्कायमेट’कडून तसे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत.
थंडीवर परिणाम होणार
डिसेंबर महिना सुरु झाला तरी थंडीची चाहूल न लागल्याने मुंबईकरांमध्ये निराशा आहे. त्यातच आज अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे यंदा मुंबईकरांना गुलाबी थंडीची वाट पहावी लागणार आहे.