अंबरनाथमध्ये २०० विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शाळेचा मुद्दा स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित केला असून लवकरच हे काम सुरू करण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले आहे. अंबरनाथ (पू.) येथील चिखलोली भागात सर्व्हे क्र.६८ मधील १.१४.० हे. आर. जमिनीवर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील २०० मुलांकरिता शासकीय निवासी शाळा बांधण्याचे प्रस्तावित आहे. ही निवासी शाळा उभारण्याकरिता आमदार डॉ. किणीकर यांनी पाठपुरावा करीत आहेत.
शाळेचे नकाशे मिळाले – डॉ. सुरेश खाडे
शाळेचे नकाशे व अंदाजपत्रके फेर सादर करण्याबाबत सामाजिक न्याय विभाग यांनी समाज कल्याण आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत. मात्र ६ महिने होऊनही अद्यापपर्यंत याठिकाणी इमारत उभारण्याबाबत समाज कल्याण विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा तारांकीत प्रश्न पावसाळी अधिवेशनात डॉ. किणीकर यांनी उपस्थित केला. सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शाळेच्या बांधकामाचे नकाशे प्राप्त झाले असून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक बाबींची छाननी करिता नकाशे सादर करण्यात आले असल्याची माहिती डॉ. किणीकर यांना दिली. या शाळेमुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याण तसेच लगत असलेल्या शहरामधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची व राहण्याची सोय होईल. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.