कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या तिनही विभागातून एकूण ३५० एसटी बसेस धावत आहेत. तसेच बेस्ट उपक्रमाच्या बसेसही सुरु आहेत. मात्र या बसेसच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने एसटी महामंडळ सोमवारपासून ३० टक्क्यांनी एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची योजना आखत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत.
हेही वाचा – Lockdown: आडमुठ्या पोलिसांमुळे आजारी बापाला खांद्यावर घेऊन मुलाला पायी जावं लागलं
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत मुंबई, ठाणे आणि पालघर विभागामार्फत शासन निर्देशानुसार विशेष वाहतूक करण्यात येत आहे. मात्र ही वाहतूक सेवा अपुरी पडत असल्याचे निदर्शनात आले होते. तसेच सोमवारपासून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ये-जा करण्याकरता बेस्ट आणि एसटीच्या बसेस फेऱ्या अपुऱ्या पडू नयेत, याकरता एसटी महामंडळाकडून एसटीच्या तिन्ही विभागात बस फेऱ्या ३० टक्क्यांनी वाढवण्याची योजना आखली आहे. याची अंलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच वाढवण्यात येणाऱ्या एसटीच्या फेऱ्या दादर – मंत्रालय, अंधेरी – मंत्रालय, अंधेरी – बोरिवली तसेच, वांद्रे सरकारी वसाहतीतून सोडण्यात येणार आहेत.