मुंबई : संत रामदास (Sant Ramdas) यांना राज्यात भिक्षा मागताना पाहून शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) व्यथित झाले आणि त्यांनी संपूर्ण राज्य हे संत रामदासांच्या चरणी अर्पण केल्याची कथा सदगुरु जग्गी वासूदेव यांनी सांगितली आहे. एवढेच नाही तर संत रामदासांनी दिलेल्या त्यांच्या अंगावरील भगव्या कपड्यालाच छत्रपती शिवाजी महाराजांनी झेंडा म्हणून स्वीकारले असल्याचा दावा जग्गी वासूदेव (Jaggi Vasudev) यांनी त्यांच्या कथा वाचनात केला आहे. यावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जग्गी वासूदेव यांच्या या कथेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी शब्दा मागे घेऊन महाराष्ट्राची क्षमा मागावी, असे आवाहन केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नको त्या विषयात हात घालून त्यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. मला वाटत त्यांनी हा वाद ताबडतोब मिटवायला हवा. शिवपती पताका म्हणजे भगवा झेंडा हा महाराष्ट्रामध्ये शिवकाळाच्या आधीपासून आहे. त्याचा एक इतिहास महाराष्ट्रामध्ये आहे. तेव्हा उगाच कारण नसताना नवीन वाद बाहेर यायला नको. माझी सद्गुरूंना एवढीच विनंती आहे. आपण हे शब्द मागे घ्यावे आणि महाराष्ट्राची क्षमा मागावी.
मला वाटतं की, भगवान सद्गुरू हे इतराप्रमाणे वाचाळ नाही आहे. ते सद्सद विवेक बुद्धी वापरून बोलत असतात. एखाद्या माणसाच्या हातनं चुक होते. तेव्हा जग्गी वासुदेव जे काही बोलले ते चुकीचं आहे, हे त्यांना त्यांचे भक्त सांगतील आणि त्याच्यानंतर सद्गुरू माफी मागतील असा मला विश्वास आहे.
काय आहे प्रकरण
सदगुरु जग्गी वासूदेव ( यांनी त्यांच्या Sadguru या यूट्युब चॅनलवर एक ऍनिमेशनसह कथावाचन केले आहे. महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. Why Chhatrapati Shivaji Maharaj Still Lives in People’s Hearts असे शिर्षक असलेल्या या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज आणि संत रामदास यांची गुरु-शिष्याची कथा जग्गी वासूदेव यांनी सांगितली आहे. त्यात संत रामदास हे दारोदार भिक्षा मागत असल्याचे पाहून शिवाजी महाराज व्यथित होतात, असे जग्गी वासूदेव यांनी सांगितले आहे.
आपले गुरु हे दारोदार भिक्षा मागत आहेत पाहून शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य हे संत रामदासांच्या चरणी अर्पण केले, असल्याचे या कथेत जग्गी वासूदेव सांगतात. त्यासोबतच संत रामदास शिवाजी महाराजांच्या हातात भिक्षापात्र देतात आणि दोघेही राज्यात भिक्षा मागतात. त्यानंतर संत रामदास हे शिवाजी महाराजांना सांगतात की यापुढे हे राज्य तुमचे नाही, शिवाजी राजांचे नाही असे लक्षात घेऊन राज्य करा. जग्गी वासूदेव यांनी सांगितलेल्या कथेनुसार, संत रामदास आपल्या अंगावरील वस्त्र शिवाजी महाराजांना देतात आणि सांगतात, की आजपासून हाच तुमचा भगवा ध्वज आहे.