राज्यात काही जिल्ह्यांत पहिला टप्पा म्हणून निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेला दिले. या दरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असेही ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी हॉटेल, रेस्टॉरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपल्याला सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरू करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसर्या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. पुढे तिसर्या लाटेतही रुग्णसंख्या वाढली तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, डॉ. पी.व्ही शेट्टी, रवि शेट्टी, राकेश शेट्टी, सुकेश शेट्टी आदी उपस्थित होते.