शहरातील भटक्या कुत्र्यांनी व मोकाट सोडलेल्या गुरांनी आपला मोर्चा प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात वळविला आहे. चक्क कुत्री आणि मोकाट गुरे येथे सर्वत्र फलाटांवर ठाण मांडून बसलेली रोज दिसत आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या व मोकाट सोडलेल्या गुराढोरांच्या भीतीने रेल्वे स्थानकात प्रवशांना बसणे तर सोडाच, परंतु येथे लोकलची वाट पाहात उभे राहणे देखील प्रचंड भीतीदायक झाले आहे. यातील एखादे जनावर गाडी आल्यावर रुळावर पडल्यास दुर्घटना होण्याचा धोका आहे.
भटक्या कुत्र्यांचा व मोकाट सोडलेल्या गायबैलांचा वावर वाढला आहे. कसारा स्टेशनवर मोठी गर्दी असते. त्यातच इगतपुरी, घोटी, नाशिक या शहरांसह ग्रामीण भागातील हजारो प्रवशांना कसारा हे कल्याण, डोंबिवली, ठाणे व मुंबई आदी ठिकाणी रेल्वेने प्रवास करण्यासाठी एकमेव असलेले महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केल्याचा आरोप रेल्वे प्रवासी करत आहेत.