महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांच्या बाजूचे, जनतेचे सरकार आहे. सरकारने आतापर्यंत कधीही निळवंडे धरण व कालव्याच्या कामांना निधी कमी पडू दिला नाही. आता प्रशासनातील अधिकार्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडताना उच्चस्तरीय कॅनालच्या कामात संगमनेरची पाइपलाईन हलवून जलसेतूचे कॉलम एक महिन्यात पूर्ण करावे अन्यथा एक महिन्यानंतर हे आंदोलक स्वतः पाईपलाईन उखडून फेकतील. तसेच नवीन वर्षात २०२२ मध्ये उच्चस्तरीय कॅनालचे काम पूर्ण होऊन शेतकर्यांना पाणी मिळाले पाहिजे, अशी सूचना आ. डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचे संथ गतीने सुरु असलेल्या कामाला गती मिळावी, यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकर्यांचे वतीने पाणी हक्क मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले चौकापासून भव्य मोर्चा बाजारतळावर येवून तेथे सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी खंडुबाबा वाकचौरे होते. याप्रसंगी आ. लहामटे बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, मच्छिंद्र धुमाळ, सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, विनय सावंत, महेशराव नवले, डॉ. रवींद्र गोर्डे, पर्बतराब नाईकवाडी, गिरजा जाधव, मच्छिंद्र मंडलिक, सुरेशराव खांडगे, आप्पासाहेब आवारी, स्वातीताई शेणकर, प्रमोद मंडलिक, भाग्यश्री आवारी, माधव भोर, जे. डी. आंबरे, कविराज भांगरे, निता आवारी, किरण गजे, सुरेश भोर, सुरेश नवले आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
यावेळी आ.डॉ.लहामटे पुढे म्हणाले की, राज्यासह तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे.अपेक्षित पाऊस झालेला नाही.त्यामुळे पाणी टंचाईची जाणिव प्रखरतेने होत आहे त्यात धामणगाव आवारी, अंबड,वाशेरे,औरंगपूर आदी गावच्या लोकांना उच्चस्तरीय कालव्याचे पाणी मिळण्यासाठी लोक वाट पाहत आहे मात्र या कालव्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने या कामास प्रशासनाने गती द्यावी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला आहे. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून हा आवाज सरकारपर्यत पोहचविणार आहे, मला राजकारणात कोण काय म्हणेल, याला महत्त्व नाही तर माझ्या माय बाप जनतेचे प्रश्न महत्वाचे आहे. मी स्वतः सरकारकडून सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील व लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेबरोबर आंदोलकाची नेते व काही गावातील सरपंचाची बैठक आयोजित करू,असे सांगितले.
प्रशासनाचे वतिने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप, प्रमोद माने, एम. बी. क्षीरसागर, प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब भोर यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश पापळ यांनी केले. सकाळी ११ वाजता अकोले शहरातून शेतकर्यांचा हा मोर्चा निघाला. यात अग्रभागी महिला होत्या. तर अनेक शेतकरी ट्रॅक्टर व अवजारासह मोर्चात सहभागी झालेे. शेतकरी महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.दरम्यान, मोर्चाला उत्तर देताना जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता संगीता जगताप म्हणाल्या, काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मे २०२२ पर्यंत पूर्ण होईल. उच्चस्तरीय कालव्याचे ४०० मीटरपर्यंत काम झालेले असून क्वाडेटचे काम झालेनंतर एक महिन्यात पूर्ण करुन जून २०२२ पर्यंत शेतकर्यांना पाणी देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.