ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा – तालुक्यातील पाणी टंचाई रोखण्यासाठी जेवढी पाणीपुरवठा योजना महत्वाची आहे.त्याही पेक्षा लघु पाटबंधारे विभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे.त्यामुळे जव्हार, मोखाडा तालुक्याच्या ग्रामीण भागात लघु पाटबंधारे विभागातून वर्षाकाठी पंधरा ते सोळा बंधार्यांची नवीन बांधकामे तर काही बंधाराची दुरुस्ती केली जाते.यासाठी जिल्हा परिषदेकडून करोडो रुपयांचा निधी मंजूर करून खर्च केला जातो.मात्र खर्चाच्या तुलनेत प्रभारी उप अभियंता पाटील यांच्या आणेवारीमुळे कामांचा दर्जा निकृष्ट होत असल्याने वर्षभरात या बंधार्यांना गळती लागते,असे आरोप आहेत.यामुळे अधिकारीच बोगस कामांना अभय देत असल्याने अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आमसभेत केली होती. परंतु ही मागणी वर्षभरानंतर ही मागणी लालफितीत अडकल्याने मागणीच राहिली आहे.
पालघर जिल्हा परिषदेतील इतर तालुक्यांपेक्षा मोखाडा तालुक्यात सर्वात जास्त बंधारे बांधले व दुरुस्ती केले जातात. विशेष म्हणजे तालुक्याबाहेरील जिल्हा परिषद सदस्य देखील आपल्या गटातील निधी मोखाड्यात द्यायला तयार होतात.त्यामुळे मोखाड्यातील पाणी टंचाई निर्मुलनासाठी करोडो रुपयांच्या निधीची तजवीज होत असतानाही केवळ अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे बंधाराची कामे दर्जाहीन होत असल्याचा आरोप आमसभेत नागरिकांनी केला होता.महत्वाचे म्हणजे या आमसभेत नागरिकांनी उपअभियंता अजित पाटील यांच्या कामचुकारपणाचा पाढाच आमदारांसमोर वाचला होता आणि त्यामुळे आमदारांनी देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र त्यानंतर उप अभियंता अजित पाटील यांनी जरी आपली काम करण्याची पध्दत बदलली असली तरी सुद्धा मागील वर्षांपासून झालेल्या बंधारातील पाणी गळती थांबलेली नाही हे ही तितकेच खरे आहे.यामुळे तुम्ही कारवाई करा, आम्ही आमच्या पध्दतीने काम करु अशी गाठ जणू अधिकार्यांनी आपल्या कामाशी बांधून घेतलेली नाहीना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकूणच बंधारा बांधण्यासाठी व जुना बंधारा दुरुस्तीसाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांची तरतूद वर्षाकाठी पालघर जिल्हा परिषदेकडून केली जात असतानाही केवळ अधिकार्यांच्या टक्केवारीमुळे लघु पाटबंधारे विभागाचे बंधारे कोरडेच असतात. तर तत्कालीन आमसभेचे सचिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदिप जाधव यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता अजित पाटील यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार त्यांच्या विभागातील वरिष्ठांना असल्याने त्यांच्या निलंबनाच्या कारवाईचा ठराव पारित करून लघु पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना पाठवला असल्याची माहिती दिली. अधिक माहितीसाठी लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अजित पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली.
लघु पाटबंधारे उप अभियंता पाटील हे स्वतः मनमानी पद्धतीने कामकाज करुन ठेकेदारांच्या बोगस कामांना अभय देत असल्याने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यासाठी आमसभेत अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला होता.मात्र अविश्वासाचा ठराव करून वर्षभराचा कालावधी लोटला असताना ही अजित पाटील यांच्यावर कारवाई झाली नाही हे गुढ मात्र अनाकलनीय आहे. यामुळे वर्षभरानंतर तरी लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता पाटील यांच्यावर कारवाई होणार का ? की पुन्हा लालफितीत अडकणार.?हा प्रश्न नागरिकांसमोर आहे.