मोखाडा: स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी टंचाई काळात डोक्यावर हंडा बसला आहे. सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंड्याने पायपीट करत पाणी आणावे लागते आहे. ही समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले यांनी पारले वर्ल्ड वाईल्ड फाऊंडेशन व माऊली ग्रुप डोंबिवली यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्या मदतीने तालुक्यातील विविध टंचाई ग्रस्त गावपाड्यांतील सुमारे 572 आदिवासी कुटूंबाना पाण्याचे लोट गाडे उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे येथील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला आहे. शासनाच्या धोरणानुसार एक ते दिड किलोमीटर अंतरावर पाणी उपलब्ध असल्यास तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत नाही.
तर टँकरद्वारे विहिरीत सोडण्यात येणारे पाणी आणण्यासाठी, महिलांना अखेर डोक्यावर हंड्याने पायपीट करत पाणी आणावे लागते आहे. त्यामुळे येथील महिलांना अनेक व्याधी तसेच आजारांना देखील सामोरे जावे लागले आहे. बोटोशी येथील कार्यक्रमासाठी भाजप आदिवासी विकास आघाडी पालघर जिल्हाध्यक्ष मिलींद झोले, कार्यकर्ते गंगाराम फसाळे.जितेंद्र हमरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत वाघ, अनंता दोरे ,मधुकर(बंडू) किरकिरे, यशवंत दोरे,पांडू भगत, सावळीराम गावंडा, संतोष दापट, गणपत कुरबुडे, इत्यादी ग्रामस्थ तसेच बोटोशी-पाथर्डी या ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना संतोष दापट तसेच आशा कार्यकर्त्या पार्वती गावंडा आदी मान्यवर उपस्थित होते.