वाडा : कारखानदारांना विविध कारणांसाठी वनविभागाकडून ना हरकत दाखले दिले जात असून ते उपवनसंरक्षक यांच्या अधिकारात येते. मात्र असे असताना गुंज बीटातील दोघा वनरक्षकांनी चक्क बनावट दाखले तयार करून काही उद्योजकांना दिले असून हे प्रकरण उघडकीस आल्याने जव्हारचे उपवनसंरक्षक यांनी दोघा वनरक्षकांना निलंबित केले असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कारखानदार, शेतकरी यांना जमीन बिनशेती परवानगी,वीटभट्टी कारखाना व इतर अनेक कारणासाठी वनविभागाकडून ना हरकत दाखल्याची आवश्यकता भासते.
या दाखवल्याशिवाय परवाना मिळत नाही. सदरचा दाखला उपवनसंरक्षक यांच्या अधिकारात येत असून त्याची स्थानिक विभाग पडताळणी करते .मात्र असे असताना गुंज बीटातील वनरक्षक गणेश गावंड व अविनाश कचरे यांनी चक्क बनावट ना हरकत दाखले उद्योजकांना दिले असल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी दोघा वनरक्षकांना निलंबित केल्याची माहिती वाडा पश्चिमेचे परिक्षेत्र अधिकारी विकास लेंडे यांनी दिली आहे. दरम्यान, गुंज बीटा व्यतिरिक्त खुपरी बीटातील काही कारखान्यांना या दोघांनी दाखले दिल्याचे खुपरी वनपालांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.जवळपास पंधरा कारखान्यांना असे ना हरकत दाखले देण्यात आले असल्याचे बोलले जात असून याबाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती लेंडे यांनी दिली.