४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी करूण नायरची निवड झाली नाही. करूणला संघात स्थान न मिळाल्यामुळे भारताच्या निवड सदस्यांवर बरीच टीका झाली. पण आता निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी आपण करूण नायरला संघातून वगळल्याची कारणे त्याला सांगितल्याचे म्हटले आहे.
निवड समिती खेळाडूंशी नेहमीच संवाद साधते
प्रसाद याबाबत म्हणाले, “वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची निवड झाल्यानंतर मी करूण नायरशी स्वतः बोललो. मी त्याला संघात स्थान का नाही मिळाले याची कारणे सांगितली. त्याला संघात पुनरागमनाचे मार्गही सांगितले. निवड समिती खेळाडूंशी नेहमीच संवाद साधत असते. एखाद्या खेळाडूला संघात स्थान का नाही मिळाले याची कारणे आम्ही त्यांना सांगतो. काही वेळा दिलेली कारणे खेळाडूंना पटत नाहीत. पण त्यांच्याशी संवाद साधणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पडतो.”
करूण चांगला फलंदाज
तसेच प्रसाद यांनी करूणला कसोटी संघात स्थान मिळण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही असेही म्हटले, “करूण हा चांगला फलंदाज आहे. त्यामुळे कसोटी संघ निवडताना आम्ही नेहमी त्याचा विचार करतो.”
माझ्याशी कोणीही संवाद साधलेला नाही
काही दिवसांपूर्वी करूण नायरने संघात निवड न होण्याबद्दल निवड समिती किंवा संघ व्यवस्थापन यांच्यातील कोणीही आपल्याशी संवाद साधला नसल्याचे विधान केले होते. “माझ्याशी कोणीही संवाद साधलेला नाही. मीही त्यांना जाऊन काही विचारले नाही. इंग्लंडविरुद्ध ३०० धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मला फक्त २ सामने खेळायला मिळाले. त्यानंतर मी संघाबाहेरच आहे”, असे करूण म्हणाला होता.