भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. भारताने लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेजिंग करत भारतीय खेळाडूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ बॅकफूटवर असून तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणने व्यक्त केले.
इंग्लंडचा खेळ अधिकच खालावू शकेल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक आठवडा हा खूप मोठा काळ आहे. दोन कसोटीदरम्यान मिळालेल्या कालावधीत इंग्लंड व भारत या दोन्ही संघांनी विश्रांती घेत शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा तयार होण्याचा प्रयत्न केला असेल. लॉर्ड्स कसोटीत विशेषतः अखेरच्या दिवशी भारताने उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे सध्या पाहुण्यांचे पारडे जड आहे. यजमान इंग्लंड मानसिकदृष्ट्या आणि क्रिकेटच्या दृष्टीनेही बॅकफूटवर आहे. त्यामुळे कोहलीच्या संघाचा तिसऱ्या कसोटीची चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसे झाल्यास इंग्लंडचा खेळ अधिकच खालावू शकेल, असे लक्ष्मण म्हणाला.
दुखापतींमुळे इंग्लंडच्या अडचणी वाढल्या
इंग्लंडचा संघ आधीच अडचणीत असून काही प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मार्क वूड तिसऱ्या कसोटीला मुकणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. त्याच्याइतक्या वेगाने गोलंदाजी करणारा दुसरा गोलंदाज इंग्लंडकडे नाही. या सर्व गोष्टींचा भारतीय संघाला फायदा होऊ शकेल. भारताने पहिल्या दिवशी चांगला खेळ केल्यास इंग्लंड संघापुढे बरेच प्रश्न उपस्थित राहतील, असेही लक्ष्मणने नमूद केले.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : कोहलीने अखेर टॉस जिंकलाच!