भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुलीने आज बुधवारपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. हा पदभार स्वीकारणारा सौरव गांगुली बीसीसीआयचा ३९ वा अध्यक्ष ठरला आहे.
माजी कर्णधार सौरव गांगुलीची नवी खेळी सुरू झाली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. बुधवारी मुंबईतील बोर्डाच्या मुख्यालयाच्या सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. गांगुली यांची बिनविरोध निवड झाली. जुलै २०२० पर्यंत सौरव गांगुली या पदावर कायम राहतील. बीसीसीआयने आपल्या ट्विटर पेजवर बीसीसीआयचा नवा अध्यक्ष माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
पदभार स्वीकारताना ६५ वर्षांचा रेकॉर्ड केला ब्रेक
४७ वर्षीय सौरव गांगुलीने बीसीसीआयची पदभार स्वीकारताना ६५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला. खरं तर, सौरव गांगुली ६५ वर्षांनंतर असा पहिला कसोटी क्रिकेटपटू आहे, जो बीसीसीआयच्या पुढील अध्यक्षपदाची धुरा सांभळणार आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटपटू म्हणून ‘विज्जी’ या नावाने लोकप्रिय असलेले महाराज कुमार विजयनगरम बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी १९५४ ते १९५६ या काळात हा पदभार सांभाळला होता.
It's official – @SGanguly99 formally elected as the President of BCCI pic.twitter.com/Ln1VkCTyIW
— BCCI (@BCCI) October 23, 2019
बुधवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा ३३ महिन्यांचा कार्यकाळही संपणार आहे. दरम्यान बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारा गांगुली हा एकमेव उमेदवार होता. त्यामुळे त्याची निवड ही केवळ औपचारिकता म्हणून उरली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची सचिव म्हणून, माहीम वर्मा यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.