तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना, त्यावेळेस परदेशी गुंतवणूकीत राज्य पहिल्या नंबरला होते. मात्र सरकार बदल्यानंतर म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळी पहिल्यावर्षी गुजरात तर, दुसऱ्यावर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेले होते. अशी टीका नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर केली. आणि आता आपले सरकार आल्यावर परदेशी गुंतवणुकीत राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आले. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात केले. पुढे बोलताना, शिंदे यांनी राज्यात एक लाख १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक आली आहे. केंद्रात आणि राज्यात समविचारी पक्षांचे सरकार असते, तेव्हाच गुंतवणुकदार विश्वास ठेवून अशी गुंतवणुक केले आहे. तर राज्याला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी बळ दिले आहे.असेही ते म्हणाले.
याचदरम्यान माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोना काळामध्ये सहाशे रुपयांची शवबॅग सहा हजार रुपयांना कुणी विकली, असा प्रश्न उपस्थित करत सत्य लोकांना समजले पाहिजेल आणि ‘ दूध का दूध, पानी का पानी ’ झाले पाहिजे असेही ते म्हणाले. तर चौकशी होणार म्हणून आता मोर्चा काढणार आहेत. पण, त्यावेळी तुम्हीच सत्तेत होता. ते तुम्हीच केलेले का होते, असा टोला लगावताना उध्दव ठाकरे यांना लक्ष केले. ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील टीका केली. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विजय गावित, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला असता तर, पालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. तसेच खड्डेमुक्त प्रवासबरोबर अपघातामध्ये गेलेले बळी वाचले असते, हे कोणी पाप केले याचे उत्तर द्या म्हणत, पुढच्या अडीच वर्षात मुंबई महापालिका खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डे मुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते आणि आम्ही ते दाखविण्याचे काम केले. या कामांसाठी महापालिकेच्या मुदत ठेवीचे पैसे वापरल्याची ओरड होत आहे. परंतु चित्र तसे नाही. आमचे सरकार आले, त्यावेळेस ७७ हजार कोटीच्या मुदत ठेवी होत्या. त्यात ११ हजार कोटींनी वाढ होऊन ठेवींचा आकडा ८८ हजार कोटी इतका झाला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.