भारताचा संघ निवडताना होणारी निवड समितीची बैठक टीव्हीवर लाईव्ह दाखवली पाहिजे, असे मत भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने व्यक्त केले. बंगालचा माजी कर्णधार असणाऱ्या तिवारीने १२ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु, २०१५ नंतर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. खेळाडूला भारतीय संघातून वगळले जाते, तेव्हा त्यामागचे कारण त्या खेळाडूला कळले पाहिजे असे तिवारीला वाटते.
एक सदस्य दुसऱ्या सदस्याकडे बोट दाखवतो
भारताचा संघ निवडताना होणारी निवड समितीची बैठक टीव्हीवर लाईव्ह दाखवली पाहिजे. त्यामुळे निवडकर्ते एखाद्या खेळाडूची संघात का निवड करत आहेत हे सर्वांना कळू शकेल आणि निवड योग्य होती की नव्हती याबाबत आपल्याला अधिक स्पष्टता येईल. एखाद्या खेळाडूला संघातून वगळल्यानंतर त्याने यामागचे कारण विचारल्यास निवड समितीचा एक सदस्य दुसऱ्या सदस्याकडे बोट दाखवतो. मात्र, संघनिवड टीव्हीवर लाईव्ह दाखवल्यास कोणाला काही प्रश्नच विचारावा लागणार नाही, असे तिवारी म्हणाला.
खेळाडूशी संवाद साधला पाहिजे
एखाद्या खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवड समितीने त्या खेळाडूशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. वगळण्यात आलेला खेळाडू नाखुश असणार आणि तो काही प्रश्न उपस्थित करणार, पण त्याला याची उत्तरे मिळायला हवीत. मागील काही वर्षांत मुरली विजय, करुण नायर, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंना संघातून बाहेर काढल्यावर कोणीही त्यांच्याशी संवाद साधला नाही. त्यामागची कारणे सांगितली नाहीत. हे योग्य नाही. संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीमधील कोणीतरी त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे, असेही तिवारीने नमूद केले.